अकोला | श्रीकांत पाचकवडे
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी शेतकरी प्रश्नांवर तातडीने लक्ष केंद्रित केले आहे. मतदारसंघात परतल्यानंतर त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बोगस बियाण्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याच्या दृष्टीने चर्चा केली.
बैठकीत अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघातील प्रत्येक गावात पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांमध्ये बोगस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. या प्रकरणी संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार पिंपळे यांनी मांडली. शेतकऱ्यांवरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नांवर सर्वंकष तोडगा काढण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, बियाणे विक्रेते आणि नुकसानग्रस्त शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नुकसानभरपाई, बोगस बियाणे प्रकरण आणि पुढील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
यावेळी आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून जनसेवेचे कार्य पुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.






