Home Breaking News अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन राज्यस्थानात विक्री ; बळजबरीने लावलं लग्न

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन राज्यस्थानात विक्री ; बळजबरीने लावलं लग्न

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन राज्यस्थानात विक्री ; बळजबरीने लावलं लग्न

नागपूर : फिरायला जाण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे राजस्थानमधील युवकासोबत बळजबरीने लग्न लावून देण्यात आल्याची खळबळजनक घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी दोन महिलांसह सहा जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जमनालाल, त्याची पत्नी, सचिन मरघडे, रोमा पाटील, गोलू व गोलूचा मामा (दोघेही रा. लिलावत, जि. कोटा, राजस्थान), अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ३७ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. प्राप्त माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. सज्जू नावाचा युवक पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना ओळखतो. २१ जुलैला सज्जू व पीडित मुलीने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला. मुलीने याबाबत आईला सांगितले. तिच्या आईने होकार दिला. त्यानंतर मुलगी, तिची आई व सज्जू हे तिघे रोमा पाटीलच्या घरी गेले. तेथून दुपारी ३ वाजताच्या सुमारास रोमा व सचिनसोबत ऑटोमोटिव्ह चौकात गेले. काही वेळाने तेथे स्कार्पिओ आली. यात जमनालाल, त्याची पत्नी व गोलूचा मामा बसले होते. पीडित मुलीच्या आईने रोमाला विचारणा केली असता राजस्थानला फिरायला जात असल्याचे रोमाने मुलीच्या आईला सांगितले. मुलीची आई सोडून सर्वजण राजस्थानकडे रवाना झाले. दुसऱ्या दिवशी दुपारी सर्वजण कोटातील रेलावद येथे पोहोचले. तेथे रोमा, सचिन व गोलूच्या मामाने मुलीचे बळजबरीने गोलूसोबत लग्न लावून दिले. यावेळी मुलगी रडत होती. सज्जूने मनाई केली असता गोलूचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याला मारहाण केली. त्याला कोटाकडे जाणाऱ्या गाडीत बसविले. त्यानंतर सज्जू हा रेल्वेने नागपुरात आला.

सज्जूने मुलीच्या आईला घटनेबाबत माहिती दिली. २५ जुलैला मुलीची आई, बहीण व शेजारी राहणारा युवकासह सज्जू हा रेलावद येथे गेला. ते मुलगी असलेल्या घरी गेले. माझ्या मुलीला माझ्या स्वाधीन करा, असे मुलीची आई म्हणाली. गोलूचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्यांना काठीने मारहाण केली. तिघांना परत पाठविले. नागपुरात आल्यानंतर मुलीच्या आईने वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाठोडा पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले. लग्नासाठी मुलींची विक्री करण्यात आल्याचा संशय असून त्यादिशेनेही पोलिस तपास करीत आहेत.

 

Don`t copy text!