श्रीकांत पाचकवडे
अकोला : हिंदवी स्वराज्य, शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या क्रांतिसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यातील महाराणा प्रताप पार्क येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला महानगराध्यक्ष जयंतराव मसने, ॲड. सुभाषसिंग ठाकूर यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी उषाताई विरक, बादलसिंग ठाकूर, विनोदसिंग ठाकूर, किशोर मांगटे पाटील, कल्पनाताई गोटफोडे, हेमंत शर्मा, माधव मानकर, विवेक भरणे, मनोज भिसे, संतोष पांडे, कृष्णा पांडे, मनोज शाहू, करण शाहू, गिरीराज तिवारी, देवेंद्र तिवारी, बंशी चव्हाण, नितेश पाली, निशा कडी, चंदा ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले की, “महाराणा प्रताप यांचे अदम्य शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती असलेली अखंड निष्ठा आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. संकटांशी झुंज देत स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपण्याचा त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.”
खासदार अनुप धोत्रे यांनीही महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांचे स्मरण केले. त्यांनी महाराणा प्रताप यांचे जीवनचरित्र हे संघर्ष, त्याग आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर व गिरीश जोशी यांनी केले. जयंतीनिमित्त उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.





